गावची उतारवयातली माणसं..! भाग - ६

युवा कथा

युवा विवेक    29-Nov-2023   
Total Views |

गावची उतारवयातली माणसं..! भाग - ५

संग्रामवाडीचा अन् गावच्या लोकांचा जगण्याचा थाट न्याराच होता, गावातील प्रत्येक एक ती व्यक्ती अस्सल बेणे होती. त्यांच्या जगण्याची गणितं आयुष्यभर त्यांना सुटली नाही पण त्यांनी कुठलीही चिंता न करता आपलं उभे आयुष्य बिंधास्त अन् निर्धोक जीवन जगत जगले. उभ्या पंचक्रोशीमध्ये गावाचे नाव करून जगाचा निरोप घेतला.

संग्रामवाडीमध्ये जन्माला आलेल्या या प्रत्येक अवलिया व्यक्तीला फार आयुष्य लाभले नाही अन् ऐन बसून खायच्या वयात त्यांनी जगाचा निरोप घेतला. जसं संत ज्ञानेश्र्वरानी आपलं या जगातलं कार्य पूर्ण झालं अन् वयाच्या बाविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेऊन जगाच्या कल्याणा आपले कार्य पूर्णत्वाकडे नेऊन आपला शेवट केला.

अलीकडे पहाटेची थंडी आता दिवसेंदिवस वाढत आहे. जसजशी पहाट होते तसतशी पहाटेची साखर झोप आधिकच गडद होत जात होती. पण पहाटेच्या साखर झोपेसोबत सवयीच्या झालेल्या काही आवाजाने मात्र मन सभोवतालच्या वातावरणातील बदल अन् कानावर पडणारे सगळेच आवाज गोधडीत पडूनही कितीवेळ ऐकत बसलेलो असतो. असं आता गेले महिनाभर सुरू असलेला काकड्या बाबतीत झालं होतं.

गावच्या तीन पार्ट्या तीन मंदिरांना जवळ करून पहाटे चार वाजताच काकडा सुरू करत होते अन् त्यांचा उंच आकाशाला भेदणारा आवाज मग कितीवेळ ऐकत बसावा असं वाटून जायचं. यासाठी कुठलं संगीत, की कुठला रिवाज, शिक्षण असं काहीही नव्हतं.

सगळं कसं आलबेल पण त्यांचा आवाज आपल्याला विठ्ठल भक्तीत रममाण करून टाकायचा अन् पहाटेच मग विठ्ठल रखुमाईच्या नावाचा धावा व्हायचा. मग सारं गाव जरी मंदिरात दर्शनाला, काकड्याला उपस्थीत नसलं तरी त्यांच्या रोजच्या कामात काम करत ती मंडळी देवाचा धावा करत असतात.

पहाटेच पूर्वेच्या दिशेने खिडकीच्या फटीतून येणारी सूर्याची कोवळी किरणं, पहाटेच्या कोवळ्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात रस्त्यावर निपचित पडलेली कुत्रे, पहाटेच उठून त्यांच्या पिलांची सुरू झालेली ओरडायची स्पर्धा. तारेवर भरलेली असंख्य पक्षांची शाळा,त्यांचं एक लईत ओरडत आसमंताला साद घालणं. बैलगाडीचा इतक्या पहाटे शेताकडे जातांना चाकाला लावलेल्या गुंघराचा येणारा आवाज.

हे गाव रहाटीच जगणं पुन्हा पुन्हा मला गावाकडे घेऊन येतं अन् मग जे असं संग्रामवाडी सारखी गावं ओळखीची होतात, जवळची वाटू लागतात. अन् मग हे असं काही लेखनातून येऊन जातं अन् गावाची गावातल्या एक एक त्या माझ्या माणसाची ओढ मला गावाकडे घेऊन येते.

मंदिरात उत्तरार्धकडे वळालेला काकडा,शेवटचा अभंग,शेवटची गवळण,शेवटची आरती,पसायदान,घंटेचा नाद,कपुरचा सुगंध,कपाळी लावलेला बुक्का,अष्टगंध,चंदन गंध,म्हाताऱ्या आजोबांचे पांढरे धोतर त्याला येणारा कस्तुरीचा सुगंध,अन् आजोबांच्या चेहऱ्यावर असलेले भक्तिभाव.

आजोबांच्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत हरी भक्तित त्यांचं रमून जाणे अन् त्यांची ती इच्छा.

झाला शेवट हा गोड । देवे पुरविले कोड ॥

नाही पडली आटाआटी । हरि उभा राहे पाठी ॥

नसता आमुचिये मनी । हाती घेववी लेखणी ॥

तुकड्या म्हणे गोड केली । सेवा देवे स्वीकारिली ॥

शिवनामायचे खळखळ वाहणारे पाणी अन् पहाटेच धुणे डोईवर घेऊन नदीच्या थडीला जाणाऱ्या बायका त्यांचा ऐकू येणारा गलका. दूरवर हापशीचा येणारा आवाज,डोंगर रानात पहाटेच राखणीच्या बकऱ्या चरायला घेऊन जाणारा ईसम. नदीचा पात्राला एकांगी होवून रंगलेला विटी दांडूचा लहानग्यांचा खेळ.

चौकात पहाटेच रंगलेल्या लोकांच्या गप्पा,पिंपळाच्या पारावर जमा झालेले म्हातारे पहाटेची उन्हं अंगावर घेत आहे. नदीच्या थडीला असलेल्या पायरीवरून त्या म्हाताऱ्या आज्याचे धोतर खोसत सूर्याला अर्ध्य देणं.

हे सगळं संग्रामवाडीमध्ये रोज घडतं अन् रोजचं हे जगणं असं लेखनातून आलं त्याच्या या अश्या आगळ्यावेगळ्या कथा जन्माला येतात.

समाप्त..!

- भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!