गावची उतारवयातली माणसं..! भाग - ४

युवा कथा

युवा विवेक    08-Nov-2023   
Total Views |

गावची उतारवयातली माणसं..! भाग - ३

संग्रामवाडीची रहिवासी नागरीक अन् त्यांच्या अश्या शेकडो कथा होत्या, त्यामुळं थंडीच्या कडाक्यात सायंकाळी माळरानावरची कामं आवघर जवळ करायची अन् येताना रानातून हरभऱ्याचा टहाळ, वंब्यात आलेला गहू घेऊन यायची. दिवसभराच्या कामानंतर सायंकाळी घरी पोहचले की गावातल्या घरी राहणाऱ्या म्हाताऱ्या घरला येणाऱ्या माणसांसाठी डेगीत पाणी गरम करून ठेवायची.

सांज जशी काळोखाकडे ढळायची तसतसे हवेतला गारवा आधीक वाढायचा. अन्; गार वाऱ्याच्या झोक्यासरशी वाऱ्याची झुळूक येऊन अंगाला काटा येईल असा गारवा देऊन जायचा. दिवसभराच्या कामानंतर घरी आल्यावर डेगीत घेतलेल्या गरम पाण्याने हातपाय धुवायला लागलं की, अंगाला चटका बसावा तसं अंग लाहीलाही करून निघायचं. अन् एकाकीच थंड पडलेल्या अंगावर पडलेलं पाणी नकोसं वाटायचं.

पहाटेच्या गारव्यात उठून पहाटेच रानाच्या वाटा जवळ कराव्या लागायच्या, त्यामुळे गावातल्या काम करणाऱ्या मंडळींची ओठ उलून सोलून गेलेली असायची. मग अश्यावेळी सायंकाळी हातपाय धुवून झाले की, जळत्या चुल्हीच्या समोर बसून त्यांना सुती कापडाने पुसून घेत चूल्हीच्या शखात सामोरे बसून शकत बसायचं.

थिजलेल्या खोरबेल तेलाच्या डब्याला जाळाच्या मोहरे ठेऊन त्यानं हातपाय,चेहरा लिंपून घेतला की जरावेळ अंगार व्हायची अन् मग बरं वाटून जायचं...

दिवसभर काम करून थकले की पोटातील भूक कासावीस व्हायची अन् मग गावातल्या प्रत्येक चुल्ही मोहरे ढणाढण भाकरी थापल्या जायच्या अन् एका अंगाला सांजेला गाय, म्हशीचे थान ओढून काढलेलं दूध पार पिवळ होईस्तोवर तापल्या जायचं अन् गुळाच्या खड्याला त्यात टाकून दोन हातावरल्या भाकरीचा काला गडी, घरदनी लोकं फस्त करून टाकायची.

बहुतेकदा या हिवाळ्याच्या गावातल्या लोकांचं पहाटे वावरात पाणी भरायला जायचं असल्यानं ओठ उलुन गेली असायची मग सायंकाळी बऱ्याच घरा मऊसुत शेवळ्याचा भात त्यात दूध अन् साखर टाकून खारुडी तोंडाला लावायला म्हणून असायची. हेच तर गाव अन् गाव रहाटीचं जगणं असल्यानं जवळचं वाटतं अन् मग गावातल्या एक एक माणसाची एक एक कथा होऊन जाते.

मग सांजेची जेवणं उरकली की मळ्यातून आणलेला हरभऱ्याचा टहाळ , गव्हाच्या ओंब्या घेऊन गावातली लिंभाऱ्याची तिन्ही पार

गावची मंडळी जवळ करायची अन् कुणी संगतीने गूळ, थोडीफार काळ्या मिठाची कवट घालून केलेली चटणी घेऊन यायची अन् मग गावातली मुलं शेकोटी पेटून त्यात तो हरभऱ्याचा टहाळ , गव्हाच्या ओंब्या भाजून घ्यायची, तिथं शेकून घ्यायची.

टहाळ भाजला की मग त्याला घरून बसायला आणलेल्या पोत्यात घालून चोळून घेत अन् मूठ मूठ टहाळ घेऊन मिठाची कवट घालून केलेली चटणी घेत गावची मंडळी खात बसायची. त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेने त्यांना वाटणारे हीव कुठल्या कुठं गायब होऊन जायचं अन् मग पारावर गप्पांचा फड रंगायचा. घटका घटका गावकऱ्यांच्या गप्पा रंगायच्या.

विझलेल्या शेकोट्या धूर सोडत राहायच्या. अश्यावेळी गावाच्या बाहेरून गावाकडे बघितलं की, गाव पेटल्याचा भास व्हायचा. अन्; आसमंतात मिळणारा तो धूर मग अजूनच विचित्र भासायचा.

गावची तरणी माणसं रात्रीच्या दहा वाजेपर्यंत शेकोटीशी बिलगून गप्पा करून झाल्या की वाढत्या हीवासरशी घरं जवळ करायची. अन् गावची म्हातारी माणसं खोकरत खाकरत भजनासाठी देउळ जवळ करायची.

गावची दहा-बारा म्हातारी माणसं देउळ जवळ करून त्यात येऊन बसली की प्रत्येकाच्या हातात टाळ दिला जायचा. विणेची तार छेडली जायची. अन् विठ्ठल रखुमाईच्या जयघोषात रात्रीच्या या भजनाला सुरुवात व्हायची, गावातल्या उंच गळ्याचा आवाज असलेल्या गवंडी बाबाची एक कहाणी न्यारी होती. गवंडी बाबाची भक्ती एका खूप उंचीला गेली होती.

त्यांनी उभे आयुष्य फक्त अन् फक्त विठ्ठल रखुमाईची आराधना अन् गोड गळ्याचा आवाज असल्यानं त्याची भजने म्हणण्यात व्यथित केलं. त्यांचं हे जगणं बघितलं की त्यांचं जगणं मग सफल वाटायचं.

त्यांचा आवाज अन् त्यांचं विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत तल्लीन होणं बघितलं की, देवाला आपल्या स्वतःला समर्पित करणं काय असतं याची जाणीव होत असे अन् नकळत आपणही मग भक्तीच्या मार्गाला लागत असे.

क्रमशः

- भारत लक्ष्मण सोनवणे.

भारत सोनावणे

माझे नाव भारत लक्ष्मण सोनवणे, मी औरंगाबाद येथील रहिवासी आहे.माझं पदव्युत्तर MBA हे शिक्षण डॉ.भिमराव आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून झालेलं आहे..!
साहित्य क्षेत्रातील माझा परिचय,माझे ललित लेख,कथा या दै.सकाळ,दै.लोकमत,दै.नवाकाळ,इत्यादी दैनिकातून प्रसिद्ध.तसेच अनेक साप्ताहिक,मासिक,दिवाळी अंक यात लेखन प्रकाशित.
अनेक कवी संमेलनात सक्रिय सहभाग,नवोदित युवा कवी म्हणून अनेक ठिकाणी माझ्या लेखनीचा सन्मान.ऑनलाईन माध्यमातून अनेक वेब पोर्टलसाठी फ्रीलांसर म्हणून सध्या मी लेखन करतो."Writing From a Blank Mind" या ललित लेखन,कथा,कविता,पर्यटन,इतिहास अश्या अनेक विषयांवर माझ्या ब्लॉग माध्यमातून जवळ जवळ १४ देशात माझं लेखन वाचले जात आहे..!