गणेशोत्सव आणि आर्थिक उलाढाल
करोनाने संपूर्ण अर्थकारण ढवळून निघाले आहे. आपण सारेच भारतीय उत्सवप्रिय आहोत. देशात विविध प्रकारचे एकावन्न मोठे सण साजरे केले जातात. त्यातील मान्यताप्राप्त असे सतरा सण पूर्ण भारतभर साजरे केले जातात. संस्कृतीचे प्रतिबिंब सण साजरे करण्याच्या वृत्तीत दिसते. बाजारात तेजी असो वा मंदी आपण प्रत्येक सण धुमधडाक्यात साजरे करतो. जिथे बहुसंख्य लोक कुणावर तरी श्रद्धा ठेवतात आणि परंपरेचे पालन करतानाच त्याचा नवा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतात. आपली हौस भागावण्याची कृती करताना फारसा खोलवर विचार केला जात नाही. याच काळात अनेक किरकोळ दुकानदारही खरेदीस प्रोत्साहन म्हणून बिलात सूट किंवा मोफत भेटवस्तू देतात. करोनापूर्व काळात आपले सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) घटत असतानाही सर्वाधिक आर्थिक उलाढाल याच उत्सव काळात झाली. शेअरबाजाराने याच काळात नीचांक गाठून लगेचच सर्वोच्च टप्पा गाठला. भारतात घट्ट पाय रोवलेली अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट, स्नॅपडील, रिलायन्स रिटेल्स, बिग बाजार वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन येतात. अनेक जण येणाऱ्या नव्या ऑफर्सची वाट पहात असतात. त्यासाठी प्रसंगी आपली खरेदी ते लांबणीवर टाकतात. या स्पर्धेचा ग्राहकांना फायदा होतो त्याची क्रयशक्ती वाढते, राहणीमान उंचावते. संपत्तीचे असमान वितरण असल्याने वस्तूंना स्वस्त पर्याय उपलब्ध होतात.
गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते. मुंबई, पुणे यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये छोट्या-छोट्या वस्तूंपासून अनेक मोठ्या वस्तूंची खरेदी केली जाते. गणपतीचे १०-११ दिवस बाजारपेठ अक्षरश: फुलून गेलेली असते. या काळात अनेक लोक फक्त त्या दहा दिवसांसाठीच दुकाने लावतात. गणपतीच्या मूर्तीपासून नैवेद्यापर्यंत अनेक गोष्टींची खरेदी-विक्री होते आणि अर्थचक्राला गती प्राप्त होते. याचा परिणाम विविध क्षेत्रांवर होत असतो.
सन २०११च्या जनगणनेच्यानुसार देशात २.१ दशलक्ष मंदिरे आहेत. त्यात अर्पण केलेल्या दानाद्वारे प्रचंड संपत्तीची उलाढाल होते. त्याच्याशी संबंधित अनेक पूरक व्यवसाय त्याच्या आजूबाजूला उदयास येतात. मंदिरे आणि उत्सव अर्थव्यवस्था उंचवण्यात बहुमोल कामगिरी करतात. पहिल्या लॉकडाऊनला बंद करण्यात आलेली मंदिरे दुसरी लाट येऊन गेली तरी, बंदच आहेत. अनेक गोष्टी हळूहळू खुल्या झाल्यावर, तिसऱ्या लाटेचा धोका असला तरी लसीकरण वेग वाढल्याने मंदिरे लवकरच उघडली जातील, असे संकेत मिळत आहेत. अशा लाटा येणारच नाहीत किंवा एकामागून एक येत राहतील याबाबत कुणीही निश्चितपणे काहीच सांगू शकत नाही. दहीहंडी, गणपती हे सण साजरे करण्यावर अजूनही निर्बंध आहेत. दुसऱ्या लाटेमुळे प्रभावित झालेल्या आरोग्यव्यवस्थेच्या मागील अनुभवावरून सरकार योग्य त्या उपाययोजना करीलच. महाराष्ट्रातील गणपती उत्सवातील दहा दिवसांत वीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होते यात वार्षिक दहा टक्के वाढ अपेक्षित आहे. बंगालमधील दुर्गापूजा महोत्सवात चाळीस हजार कोटी रुपयांची उलाढाल होत असून त्यात वार्षिक पस्तीस टक्के वाढ अपेक्षित आहे. रोज पन्नास ते साठ कोटी रुपयांची खाद्यपदार्थ विक्री या काळात होते. यामुळे असंघटित, अकुशल क्षेत्रात रोजगारनिर्मिती होते. रक्षाबंधनाच्या निमित्ताने चारशे कोटींची उलाढाल होऊन चार हजार कुटुंबाना रोजगार मिळाला आणि उत्तरायणच्या निमित्ताने पाचशे कोटींची उलाढाल होऊन सहा हजार कुटुंबाना रोजगार मिळाला. या सर्वांत मोठी उलाढाल दिवाळीत होते. त्याखालोखाल गणपती उत्सवात. देशभरात या काळात मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे, वाहने, फटाके याची खरेदी होते. प्राधान्यक्रम बदलून विक्री वाढत असल्याने अनेक देश आपल्याकडे त्याच्या उत्पादनांचे संभाव्य खरेदीदार म्हणून पहात असतात.
उत्सवातील चिनी मालाचा वाढता प्रभाव चिंताजनक आहे सर्वच क्षेत्रात चीनने स्वस्त पर्याय उपलब्ध करून दिल्याने अनेक रोजगार नष्ट झाले आहेत. स्वदेशी उत्पादनांना प्रोत्साहन मिळेल असे प्रयत्न चालू सरकारी आणि खाजगी पातळीवर चालू आहेत. मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये Value for Money असे पर्याय उपलब्ध नाहीत त्यामुळे या वस्तूवर पूर्णपणे त्यांचा प्रभाव आहे. देशात तरुणांची संख्या जास्त आहे त्यांनी काही सण नवीन निर्माण केले आहेत. पूर्वी क्वचितच साजरे केले जाणारे वाढदिवस नियमित साजरे केले जातातच शिवाय ५०, ६०, ७५ वर्षांचे वाढदिवस, लग्नाचा २५, ५०, ६० वा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला जात असल्याने त्याचे रुपांतर उत्सवात झाले आहे. ३१ डिसेंबरला रात्री नव्या वर्षाचे स्वागत, १४ फेब्रुवारीस येणारा वेलेन्टाइन डे त्याच्या मागेपुढे साजरा केला जाणारा विविध दिवसाचा सप्ताह, मदर्स डे, फादर्स डे अशा विविध दिवसांची त्यात भर पडली असून कोणत्या ना कोणत्या निमित्ताने खरेदी करणे, पर्यटनास जाणे बाजारात नव्याने आलेल्या वस्तू आपल्याकडे हव्यातच अशी उपभोगाची मानसिकता या वर्गाची आहे. हे लोक टेक्नोसॅव्ही आणि दक्ष असल्याने एखादी वस्तू लोकप्रिय करतील तशी अप्रियही करू शकतात. हा वर्ग कायम आपल्या बाजूस असावा, मधल्या कालखंडात ठप्प झालेले अर्थचक्र आता विनाव्यत्यय चालू राहावे म्हणून नवनवीन उत्पादने बाजारात येत आहेत.
उदय पिंगळे, अर्थ अभ्यासक