अनुभवलेली वारी

11 Jul 2023 15:22:17

 अनुभवलेली वारी  

एक दिवसामध्ये माझं ठरलं, की मला वारीला जायचं आहे. मग दिंडीची शोधा शोध सुरू झाली, कुठल्या दिंडीत आपली वर्णी लागते काय? पहिल्यांदा एका दिंडी चालकांना विचारलं, की मला येता येईल का तुमच्याबरोबर असं? पण त्यांच्याकडे अगोदरच संख्या पूर्ण झाल्यामुळे मला त्यांनी नाही सांगितलं. माझा एक मित्र आळंदीतला. त्याला मी फोन केला आणि त्याला विचारलं की मला वारीला जायचंय कोणाच्या दिंडीत जाता येईल का? त्यानं मग साधारण पंधरा मिनिटांमध्ये सांगितले की एक सरकटे महाराज आहेत त्यांच्याकडे जागा आहे. तू त्यांच्यासोबत जाऊ शकतो. मग मी कॉन्टॅक्ट वगैरे घेतला आणि त्यांच्याशी बोललो की मला यायचे आहे. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सगळे डिटेल्स पाठवले. मी नोंदणीचे पैसे भरले आणि दुपारनंतर त्यांना जॉईन झालो. तेव्हा त्यांची दिंडी पुण्यामध्ये आली होती. पुण्यामध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांच्यासोबत मग भजन संध्याकाळी हरिपाठ, किर्तन करत तो दिवस गेला. वेगवेगळ्या प्रकारचे वारकरी वारीत होते. कुणी शेतकरी, कुणी रिटायर्ड शिक्षक, कोणी उद्योजक, कोणी जमीनदार काहीजण दरवर्षी वारी करणारे, काहीजण पहिल्यांदाच माझ्यासारखे वारीचा अनुभव घेण्यासाठी आलेले, असं सगळं एकत्र आम्ही वारीचा प्रवास करत होतो. दररोज संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तन नित्यनेमाने व्हायचं. आमच्या दिंडीमध्ये साधारण सहा ते सात कीर्तनकार सोबत वारीत येणारे होते, तर मग त्यांचं आलटून पालटून रोज संध्याकाळी कीर्तन असायचं. माझ्या वयाची तीन ते चार मुलं वारीत आमच्या सोबत होती. एक पखवाज वादक, एक कीर्तनकार, एक गायक आणि असेच दोन वारीत आलेले. पुण्यातून बिबवेवाडीतून दिंडी जेव्हा दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजता निघाली ती सासवडच्या दिशेने. पुणे ते सासवड हा तसा ३२ किलोमीटरचे अंतर पहाटे पहाटे भजन करीत अभंग म्हणत, राम कृष्ण हरीचा जप करत वारीला निघालेले वारकरी पूर्ण रस्ता भरून दिसत होते. सर्व ठिकाणी एकच नाद ‘राम कृष्ण हरी माऊली’! हडपसरच्यापुढे हे दृश्य पाहायला मिळतं. मध्येच कोणी चहा वाटप करत होते, कोणी नाश्ता देत होते, माऊली चहा घ्या, माऊली नाष्टा करा पूर्ण रस्ता तुडुंब भरला होता. टाळांचा निनाद घुमत होता. भगवंताच्या नामस्मरणाने आसमंत व्यापला होता. खरंतर मनामध्ये एक उत्सुकता होती, की वारीचा अनुभव कसा येईल किंवा वारीत कसं चाललं पाहिजे? पंढरपूरपर्यंत जायचे म्हणजे साधारण अडीचशे किलोमीटरचा हा प्रवास होता. तो पायी आपल्याला चालायचा आहे. पहिल्यांदाच मी चाललो होतो. माझ्या मनात थोडसं येत होतं की आपल्याला चालणं होईल का? दिल्लीतल्या एका बाबांनी सांगितलं, की माऊली करून घेतील आणि माझाही याच्यावर विश्वास होता की इच्छाशक्ती असेल तर आपण काहीही करू शकतो. इच्छाशक्ती दाटूनच आली होती माझ्यामध्ये की आपण वारी करायचीच. त्याच इच्छाशक्तीने हा प्रवास सुरू झाला. हडपसर झाल्यानंतर मध्ये मध्ये फुगड्या खेळत विठ्ठलाचे नाम जपत नाचून भजन करत आमची दिंडी दिवे घाटात पोहोचली. घाट चालायचा आहे, किती दूर असेल, काय असेल याची काही कल्पना नाही. पण पूर्ण रस्ता भरून आलेला. म्हणजे अशी परंपरा आहे की पुणेकर माऊलींच्या पालखीला वाट दाखवायला सासवडपर्यंत जातात आणि ही परंपरा आजपर्यंत पुणेकरांनी जपली आहे, हे चित्र आपल्याला दिसतं. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकही याच्यामध्ये सासवडपर्यंत पायी येतात. म्हणजे आयटी दिंडीसारखा अभिनवप्रकारे आपल्याला पाहायला मिळतो. पूर्ण रस्ता तुडुंब भरलेला. लोक माऊलींच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी उत्सुकतेने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन बसलेले. घाटावरही त्या डोंगरावर ही जिकडे पाहू तिकडे हे दृश्य होतं. वाटेमध्ये भरपूर पाण्याचे टँकर, अन्नदान; लोक नाही ते दान करण्याचा आपल्या परीने प्रयत्न करत होते. मग आईस्क्रीम, कुल्फी असेल, पाणी बॉटल असेल, लोक भरभरून सेवा करण्याचा प्रयत्न करत होते. वाटेमध्ये मेडिकल कॅम्प, पाय दुखत असणाऱ्या आजी-आजोबांचे पाय दाबून देणारी काही मंडळी आपल्याला वाटेमध्ये दिसतात. वेगवेगळ्या क्षेत्रातले राजकीय पुढारी, उद्योजक, वेगवेगळी मंडळ हे आपल्याला सेवाकार्य करताना या रस्त्यामध्ये दिसतात. वारकरी जात असताना त्याच्या मनामध्ये काय भाव असतो, याची प्रचिती मला आली. मी एका बाबांना वारीमध्ये विचारलं, की तुम्ही किती वर्ष झालं वारी करता? तर ते बाबा मला म्हणाले आठवत नाही; पण तुझ्या एवढा असल्यापासून मी वारी करतो. असेच पुढे जात असताना एक बाबा एकटेच डोक्यावर पंधरा दिवसाचे आपले साहित्य घेऊन जाताना दिसले.

आमच्या दिंडीतला एकाने विचारले, की कोणासोबत चालले तर ते म्हणाले की एकटाच चाललोय. कधीपासून येतायत विचारलं तर ते म्हणाले की आठवत नाही तेव्हापासून येतो. म्हणजे वय झालेला पाय उचलत नव्हता, तरीही ते वारी करत होते हे बघून मला खूप ऊर्जा आली. घाट चढताना एका वेळेला असं झालं की आपला पाय उचलत नाहीये, तरीपण दिंडीतले वारकरी एकमेकांना ऊर्जा देत, भजन म्हणत, नाचत नाचत सगळ्यांना घाट चढवत घेऊन गेले. भयाण आनंद येत होता. उड्या मारून भजन करण्याचा आनंद, कोणी फुगडी खेळत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विलक्षण आनंद दिसत होता. कीर्तनकार मंडळी वेगवेगळी भजनं, गवळणी अभंग गात होती. त्यातून वारकऱ्यांना वेगळीच ऊर्जा प्राप्त होत होती. म्हणजे साठी ओलांडलेले वारकरीही तेवढ्याच गतीने चालत होते आणि भजनाचा आनंद घेऊन नाचत होते. मला एका वेळेला असं वाटलं की, कुठून येते एवढी ऊर्जा? नामावर इतका विश्वास? खरंच साधारण माझ्या पिढीला एकदा तरी वारीला जायला हवं असं म्हणतात. एक तरी वारी अनुभवावी. पुढे वेगवेगळे टप्पे ठरलेले होते. सासवड नंतर लोणंद, जेजुरी, बरड, माळशिरस, नातेपुते, वाखरी या सगळ्यांमध्ये काही मुक्कामाच्या ठिकाणी आम्हाला राहुट्यामध्ये राहायला मिळालं. त्यामध्ये रात्र काढणं, तिथं लाईट नाही काही नाही आणि काही ठिकाणी तर संध्याकाळच्या हरिपाठ आणि कीर्तनामध्ये इतकं सुंदर वातावरण तयार व्हायचं की मन एकदम प्रफुल्लित व्हायचं. परमात्म्याच्या नामस्मरणामध्ये तल्लीन झालेले सर्व वारकरी बघून, एवढे थकले असतानाही न चुकता हरिपाठ, कीर्तन व्हायचं आणि वारकरी आपला थकवा त्याच्यामध्ये नष्ट करून टाकायचे. एवढं सुंदर दृश्य असायचे ते मला बघून असं वाटायचं खरं सुख हे इथेच आहे. तुकोबांनी असं म्हटलं, तुका म्हणे माझे हेचि सर्व सुख!

सावळ्या श्रीरंगाच्या भेटीसाठी आतुर झालेलं मन जेव्हा त्याच्या भक्तीमध्ये रंगतं तेव्हा सारा परिसर सकारात्मकतेने रंगून जातो, हे जाणवतं. अक्षरश: काही दिवसानंतर चालून चालून पायांना ही सवय होते की आपल्याला चालायचं आहे. पायही विठ्ठल विठ्ठल करू लागतात. भजन म्हणू लागतात. पायांनाही त्या नामस्मरणाची सवय होऊन जाते. हा सगळा टप्पा पार करून वारी जेव्हा येते तेव्हा वारीला आलेल्या वारकऱ्यांच्या आनंदाचा बांध फुटतो. तिथून वेगळ्याच उर्जेने लोक पंढरपूरकडे कूच करतात. विठ्ठलाच्या भेटीची तीव्रता प्रत्येकामध्ये दिसू लागते आणि जेव्हा पंढरपूर लागतं तेव्हा मनामध्ये वेगळीच उत्सुकता दाटून येते. पंढरपूरात पहिल्यांदा पोहोचल्यानंतर चंद्रभागेच्या वाळवंटात सर्व दिंड्या पोहोचतात. स्नान सर्व वारकरी करतात.

सलग १५ दिवस पायी वाट चाललेले पाय चंद्रभागेच्या पाण्याचा स्पर्श जाणवताच ताजेतवाने होतात. तेव्हा मन अनुभव करतं हा सोहळा स्वर्गाच्या ही नशिबी नाही. भुवैकुंठ पंढरपूरच्या वाळवंटात स्नान करून आल्यानंतर जी जाणीव होते ती अवस्था कोणीच शब्दात व्यक्त करू शकत नाही. जो तो उच्च कोटीच्या परम आनंदात न्हाऊन निघाल्यासारखा भासतो. उन्हातान्हात चालताना चेहरा जरी काळवंडला असला तरी त्याच्या चेहऱ्यावर चंद्रभागेच्या पाण्याचा स्पर्श झाल्याने जे तेज झळकत ते कोणत्याही सौंदर्य प्रसाधनाने येणार नाही. ओठाने गोड हास्यात डुबकी घेतल्यासारखे प्रत्येक वारकऱ्याला माऊली जय हरि म्हणत एकमेकांच्या पाया जो तो पडत होता. बाल, अबाल, किशोर, तरुण, म्हातारे पार साठीला टेकलेले ही लहानांच्या पाया पडतं. ते परत मोठ्यांच्या पाया पडत. एक वेगळाच भाव सगळ्यांमध्ये दिसत होता. भावशून्य अवस्थाच हो ती. त्याला व्यक्त होण्याकरिता शब्द सापडणार नाही. प्रत्येकामध्ये सगुण साकार निर्गुण निराकार श्रीरंग समजून माऊली आपसूक तोंडात यायचं.

रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा । मंत्र हा जपावा सर्व काळ ॥२॥

तुका म्हणे सोपे आहे सर्वाहूनी । शहाणा तो धनी येतो तेथे ॥३॥

तुकोबांनी या अभंगात सांगितलं की इथ येणारा शहाणा आहे सर्वामध्ये धनिक आहे. खरं म्हणजे वारी जाण्याची बुद्धी सूचन हे शहण्याचंच लक्षण आहे. त्याच्या नशिबी वैकुंठाला येण्याचं भाग्य लाभलं. त्याच्या एवढा धनिक दुसरा नाही.

गावोगावच्या दिंड्या पंढरीत दाखल होतात. चंद्र भागेत डुबकी मारून साक्षीदार राहिलेल्या सूर्याला अर्घ्य देऊन पंढरीच्या पांडुरंगाला प्रदक्षिणा घालत. विठूचा गजर करत सर्व दिंड्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात. मग वारकरी सावळ्या श्रीरंग डोळ्यात साठवण्यासाठी रांगेत उभे राहतात. जवळजवळ १५ ते २० तास उभे राहून वारकरी दर्शन घेतो. अवघा देह पांडुरंग होऊन जातो आणि डोळ्यातील पाणी चंद्रभागा.

- प्रसाद जाधव

Powered By Sangraha 9.0