उन्हाळी सुट्टी

युवा विवेक    12-May-2025
Total Views |


उन्हाळी सुट्टी  

उन्हाळी सुट्टी म्हणजे सर्वांसाठी एक पर्वणीच असते.वर्षभर शाळा आणि क्लासेस करून विद्यार्थी पुरता थकून गेलेला असतो.त्याचा कंटाळा जाऊन नवीन उत्साह संचारित होण्यासाठी उन्हाळ्याची सुट्टी कामी येते.

पूर्वी आम्ही लहान असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जायचो. खूप खेळायचो, बागडायचो रात्री बाहेर खाट टाकून तारे मोजण्यात जी मजा यायची त्याला तोडच नव्हती. मस्त आमरस पुरीचा बेत करणे, बरोबरच्या मुलांबरोबर खेळणे. दिवसभर उन्हात खेळूनही कधी चेहरा काळा पडला नाही कि काही त्रास झाला नाही.. अर्थात तेव्हाच वातावरण ही शुद्ध होतं. एक वेगळाच उत्साह असायचा. नात्यांविषयी एक ओढ, आपुलकी, सखे,चुलत, मावस भावंड इतक घट्ट नातं होतं की सख्खे, चुलत हे ओळखणे देखील कठीण होतं.. त्यामुळे आम्ही पैसा जरी गरजेपुरता/ चैनीपुरता कमवत असलो तरी आमच्या जवळ नात्यांची श्रीमंती खूप जास्त होती. जी पैसे देऊनही घेता आली नसती..

आजकालच्या मुलांकडे पाहिलं की खरोखर वाईट वाटतं.. त्यांना लहान वयात सगळ्या गोष्टी अगदी हातात आहेत परंतु तरीही त्यांच्या चेहऱ्यावर एक निराशा जाणवते. अर्थात जो प्रकर्षाने पाहतो त्यालाच ही गोष्ट जाणवते.. मोबाईल हे कारण आहेच परंतु त्याचे महत्त्वही आहे व्यवहारात त्यामुळे एकट्याने ह्याच गोष्टीला दोष देऊनही उपयोग नाही.

मग याच्यावर उपाय म्हणून जशी मुलांना शाळेला उन्हाळी सुट्टी असते. तसेच शालेय वयातील ज्या मुलांकडे मोबाईल आहे त्या मोबाईललाही सुट्टी द्या म्हणजे त्यांचा दिनक्रम ठरवा मोबाईल शक्यतो पालकांनी स्वत: कडे ठेवा. त्यालाही थोडी विश्रांती मिळेल. मुलांना एकाग्रतेने स्वतःची आवड जाणून घेण्यासाठी वेळ द्या. त्यांना स्वतःचे मनन करण्यास सांगा आणि संध्याकाळी त्याविषयी आढावा घ्या.. त्यासाठी त्यांना एखादी उपयुक्त वस्तू भेट म्हणून द्या म्हणजे मुलं ऐकतील आणि सांगितलेली कृती करतील.. जगात अशी कोणतीही गोष्ट नाही की त्याला पर्याय नाही, पर्याय आहे फक्त तो आपण जाणून कृती केली तर निश्चितच अपेक्षित कृती घडण्यास मदत होईल..

मुलांना वारंवार किती मोबाईल बघतो हेच वाक्य वर्षानुवर्ष म्हणण्यापेक्षा त्यांच्या मनात अलगद शिरून तो मोबाईल त्यांच्याच हाताने त्यांना साईडला ठेवायला भाग पाडा.

पूर्वीची उन्हाळी सुट्टी आणि आत्ताची उन्हाळी सुट्टी यात जरी निश्चितच मोठा फरक असला तरीही जशी आपल्या आई-वडिलांनी आपल्याला त्यांच्या क्षमतेनुसार उन्हाळी सुट्टीत आनंद घ्यायला शिकवले. आणि वर्षानुवर्ष जसा तोच पायंडा पुढे चालत राहिला.. तसेच आत्ताच्या आई-वडिलांनी त्यांच्या क्षमतेनुसार आणि मुलांच्या हिताचा विचार करून योग्य मार्गाचा अवलंब करीत उन्हाळी सुट्टीचा पायंडा set केला तर निश्चितच तो पुढे निरंतर राहील यात शंका नाही.. प्रयत्न करा सकारात्मक विचारांना यशाची 100% जोड असते.

आनंदी राहा आनंदाने आयुष्य जगा!

नेहा कुलकर्णी-जोशी 

(शिक्षिका)