पर्यावरण : आपली जबाबदारी

युवा विवेक    11-Jun-2025
Total Views |


पर्यावरण : आपली जबाबदारी 

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!

तुकोबांचा हा अभंग आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. सोनंनाणं, दागदागिने हे सगळे मातीमोल आहेत आणि निसर्ग हाच आपला खरा सोयरा आहे, निसर्गातली झाडं, प्राणी हे आपले सोयरे आहेत. हा विचार तुकोबा त्यांच्या अभंगातून आपल्यासमोर मांडतात. पण खरंच आपण यातून काही शिकलो आहे का? आपण सगळे निसर्गाप्रती काम करण्यासाठी काही ठोस पावलं उचलतोय का? आणि याचे उत्तर बऱ्यापैकी ‘नाही’ असंच आहे. अशाने परिसर स्वच्छ होईल? पर्यावरण स्वच्छ होईल?

नुकताच ५ जून रोजी पर्यावरण दिन साजरा झाला. अनेक ठिकाणी यासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले, वृक्षारोपण करण्यात आले, स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या. पण याचा खरंच कितीकसा उपयोग होतो? म्हणजे त्या दिवसापुरता, त्या वेळेपुरता फक्त तो कचरा उचलला जातो, नंतर पुन्हा तिथे घाण होतेच. तो कचरा पुन्हा होऊच नये यासाठी किती खबरदारी घेतली जाते? जी झाडे लावली जातात त्यांची काळजी घेऊन, संगोपन करून त्यांचे संवर्धन केले जाते का? पर्यावरण दिन साजरा करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमधूनच कितीतरी पर्यावरणाला हानिकारक असा कचरा निर्माण केला जातो. त्या कचऱ्याची खरंच योग्य प्रकारे विल्हेवाट होते का? ‘लोकसंख्या वाढली, वाहनांची संख्या वाढली. आता दोन पदरीचे चार पदरी रस्ते करू’ असं म्हणत डोंगरं पुन्हा फोडली जातात. त्यात कापल्या जाणाऱ्या झाडांचं सरकारकडून किंवा अगदी सामान्य नागरिकांकडून का होईना पुनर्वसन होतं का? आणि प्रश्न फक्त झाडांचाच नाही, तेथे राहणाऱ्या प्राण्यांचं- पक्षांचं-कीटकांचं काय? रोजच्या आयुष्यात रोजच्या बातम्या वाचताना, समोर कचऱ्याचा ढीग पाहून नाक धरताना असे असंख्य प्रश्न पडतात. पण हे प्रश्न अनेकदा निरुत्तरितच राहतात. कारण या प्रश्नांच्या डोंगरापुढे एकटा माणूस काहीच करू शकत नाही.

आता तुम्ही म्हणाल कित्ती प्रश्नांचा भडिमार केलाय. पण प्रश्न विचारल्याशिवाय उत्तरे सापडत नाहीत. आणि याची उत्तरं ग्रहताऱ्यांच्या पुस्तकात, रॉकेट सायन्स च्या पुस्तकातच मिळतील असं नाही ना! याची उत्तरं आपल्याकडे आधीपासूनच आहेत. याची उत्तरं आपल्या संस्कृतीत आहेत. हे वेगवेगळे शोध लागण्याआधी आपण निसर्गाशी जोडलेलेच होतो. निसर्गातल्याच वस्तूंचा वापर करून आपण आपली कामं साधत होतो. पण प्लास्टिकसारख्या वस्तूंचा शोध लागला आणि आपण निसर्गापासून दूर गेलो असंच म्हणावं लागेल. आणि हे फक्त एकट्यादुकट्याचं काम नाही. सगळ्यांनी मिळून यात उतरणं गरजेचं आहे.

नियम हे ‘तोडण्यासाठी’ नाही तर ‘पाळण्यासाठी’ असतात, हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि ते नियम काय आहेत, काय करणं गरजेचं आहे हे इथे सांगण्याची गरज नाही. साधे-सोपे नियम आहेत, ‘R’चे फॉर्म्युले आहेत. Reduce, Reuse, Recycle, Rethink, Refuse and Repair म्हणजेच कमीत कमी वापर, पुनर्वापर, दुरुस्ती, एखादी वस्तू वापरण्यास नकारच देणे अशी काही सूत्रे खऱ्या अर्थाने कचरा व्यवस्थापन करेल. यातूनच कचरा नावाच्या मोठ्या संकटातून निसर्गाची मुक्तता होईल.

आपल्या परीने होईल तितकं करूया! बाकी नुसतं लिहिण्यापेक्षा, तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा कृतीवर जास्त भर देऊया!

|| सार्थकी वेदपाठक ||

८७९९९८४४०८