आषाढी वारी!

युवा विवेक    23-Jun-2025
Total Views |


आषाढी वारी!

भेटी लागी जीवा... लागलीसी आस...

दरवर्षी लाखो वारकरी सावळ्याच्या ओढीने पंढरीची वाट धरतात. ज्ञानोबांनी सुरू केलेली ही परंपरा आजही प्रत्येक माऊली डोक्यावर तुळस घेऊन, गळ्यात तुळशीमाळ घालून आणि कपाळावर गंध-बुक्क्याचा टिळा लावून पुढे नेत आहेे. खरंच काय असतं या वारीत जी गेली शेकडो वर्ष नित्यनेमाने ही वारी चालत आहे?

मला वाटतं, या वारकरी मंडळींच्या पायात रक्तामांसाच्या ताकदीपेक्षा ज्ञानोबा-तुकोंबाच्या नामाची ताकद जास्त आहे. म्हणजे पाहा ना मंडळी, देवाच्या भक्तांना देवाहून श्रेष्ठ करते ही वारी! दिवसरात्र विठू नामाच्या गजरात आकंठ बुडालेल्या ह्या वारकऱ्यांना नक्की ओढ लागते तरी कशाची...? त्या सावळ्याच्या मनमोहक रूपाची की चंद्रभागेच्या अमृतधारे की भागेतीरीच्या वाळवंटाची की केवळ त्या मंदिराच्या कळसाची? कितीतरी वारकरी केवळ कळसाच्या दर्शनाने तृप्त होतात. आपल्यासारख्या सामान्य माणसाला वाटेल की फक्त कळसाचं दर्शन घेऊन कसलं मिळतंय समाधान! पण जसा देव फक्त मनीच्या निर्मळ भावाचा भुकेला आहे तसाच त्याचा भक्तसुद्धा फक्त त्या भेटीचा भुकेला आहे. ती भेट त्या मातीशी... ती भेट त्या पहिल्या नामदेव पायरीशी... ती भेट त्या चंद्रभागेचे तीर्थाशी... ती भेट त्याच्या चरणांशी...

महिनाभर दिवसामागे दिवस चालायचं. २४-४८ तास त्या रांगेत उभं राहायचं. यानंतर तेव्हा कुठे काही क्षणांपुरतं दर्शन होतं या विठूमाऊलीचं! तत्क्षणी डोळ्यांत समाधानाच्या अलौकिक आनंदाश्रूंचा पूर येतो. आणि त्यावेळी वाटतं याचसाठी असते ही वारी!!!

संत परंपरेतून सुरू झालेली ही आषाढी वारी आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे. कधी वारीत वर्षांनुवर्षे नित्यनेमाने वारी करणाऱ्या आजोबांच्या खांद्यांवर बसलेला त्यांचा नातू विठूनामात दंग झालेला दिसतो. तेव्हा वाटतं की ही परंपरा जोपर्यंत सूर्य, चंद्र, तारे आहेत तोपर्यंत अविरत राहणार आहे. आणि प्रत्येक माऊली म्हणेल,

पाऊले चालती पंढरीची वाट...

सार्थकी वेदपाठक

संपर्क : ८७९९९८४४०८