ए वतन तेरे लिए

युवा विवेक    26-Jul-2021   
Total Views |

war_1  H x W: 0 
काल संध्याकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर वाचन कट्टा यांच्यातर्फे आयोजित कारगिल विजय दिवसाच्या पूर्वसंध्येला एका कार्यक्रमाला झूम वरून उपस्थित होतो. प्रमुख वक्ते होते निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर. त्यांच्या कडून कारगिल विजय गाथा ऐकताना एका सैनिकाचा उल्लेख आला. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने इतिहासाच्या पानात लुप्त झालेल्या अश्याच एका सैनिकाची गाथा आजच्या दिवसाने पुढे ठेवत आहे.
ए वतन तेरे लिए...
हर करम अपना करेंगे
हर करम अपना करेंगे
ए वतन तेरे लिए......
दिल दिया है जां भी देंगे
ए वतन तेरे लिए......
कर्मा चित्रपटातील हे गीत ऐकलं की आजही अंगावर रोमांच उभे राहतात. पण रोमांच उभं राहणं वेगळं आणि ते प्रत्यक्षात जीवाची बाजी लावून खरं करणं यात जमीन आस्मानाचा फरक आहे. तो जेवढा फरक आहे तेवढाच फरक एक सैनिक आणि एका सामान्य नागरिकात आहे. कारण ज्यांनी कधी कारगिल, द्रास, बटालिक, मश्कोह हा भाग पहिलाच नाही त्यांना कारगिल युद्धाची जाणीव तितकी होणार नाही. कारण युद्ध हे अनुभवावं लागते ते घरात बसून समजून घेता येत नाही. ही गोष्ट आहे अश्याच एका सैनिकांची ज्याने वर लिहलेला प्रत्येक शब्द अनुभवला. आपल्या प्राणाची बाजी लावून भारताच्या सरहद्दीचं रक्षण करण्यात मोलाची भूमिका बजावली. त्याच्या या पराक्रमाचे वर्णन त्याच्या कमांडींग ऑफिसर कडून ऐकण्याचं भाग्य मला काल लाभलं. ते म्हणजे निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर.
राजस्थान च्या झुंझुणु जिल्ह्यातील एक १९ वर्षाचा तरुण भारतीय सैन्याच्या ८ जट बटालियन मधे १९८० साली दाखल झाला. आपल्या चपळतेने त्याने डोंगर रांगामधील चढाईत निपुणता मिळवली होती. त्याच नाव होतं 'हवालदार शिशराम गिल'. १९९९ ला कारगिल युद्धाचे पडघम वाजल्यावर ऑपरेशन विजय च्या अंतर्गत ८ जट बटालियन ला भारताच्या सरहद्दीच रक्षण आणि त्याच्या आत घुसलेल्या पाकिस्तानी सैनिकांना पळवून लावण्याची जबाबदारी दिली गेली होती. त्यांना १७,००० फूट उंचीवर असलेल्या शत्रूच्या 'मंजू' नावाच्या पोस्ट वर तिरंगा फडकवायचा होता. कारगिल युद्धात शत्रूकडे उंचीचा फायदा होता. भारतीय सैन्याची कोणतीही कारवाई शत्रू डोंगरावरून बघू शकत होता. भारतीय सैन्य दरीत तर शत्रू डोंगरावर दबा धरून बसला होता. डोंगरावर चढाई करण्याची कोणतीही हालचाल आणि शत्रूला त्याचा सुगावा लागणार हे स्पष्ट होतं.
भारतीय सैन्याकडे एकच पर्याय होता तो म्हणजे शत्रूला चुकवत डोंगर चढाई करायची. रात्रीची वेळ हा एकमेव पर्याय होता कारण सूर्याची किरण आली की शत्रूला सुगावा लागणार. हा सगळा भाग जवळपास १५,००० ते १७,००० फुटावर होता. त्यामुळे चढाई साठी कित्येक तास लागणार होते. शत्रूची एक नजर आणि खेळ खल्लास कारण लपायला एक झाडही त्या उंचीवर नव्हत. सरळसोट ७० ते ८५ अंशाचे कडे समोर होते. प्रतिकूल वातावरण, थंडी अश्या प्रतिकूल वातावरणात वरून होणारा गोळ्यांचा, मोर्टार चा मारा. या सगळ्याला चुकवत आपलं लक्ष्य साध्य करणं हे एक खूप खूप कठीण काम होतं. रात्रीच्या वेळेत ही बर्फापेक्षा थंड असलेल्या कातळांवर चढाई करणं सोप्प नव्हतं. ८ जुलै १९९९ च्या रात्री भारताच्या मदतीला निसर्ग आला. डोंगरावर पावसाचे ढग उतरले. ढग आणि पावसामुळे शत्रूला दरीत काय चालू आहे हे उंचीवरून दिसणार नव्हतं. हीच वेळ होती की लक्ष्याकडे कूच करण्याची. लेफ्टनंट जनरल पाटणकरांनी आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की सकाळी तिरंगा मंजू पोस्ट वर फडकला पाहिजे. रात्रीच्या अंधारात पाऊस पडत असताना १७,००० फुटावर हाडं गोठवणाऱ्या थंडीत चढून जाण अशक्य अशी गोष्ट होती पण घाबरतील ते भारतीय सैनिक कुठले. क्षणाचा विलंब न करता त्या टीम चा लिडर हवालदार शिशराम गिल ने सांगितलं, 'हम अपना मिशन कामयाब करके लौटेंगे'.
रात्रीच्या त्या काळजाला थरकाप उडवणाऱ्या अंधारात आणि पावसात हवालदार शिशराम गिल च्या नेतृत्वाखाली भारतीय सैनिकांनी मंजू पोस्ट कडे कूच केलं. अतिशय खडतर आणि अशक्य असणाऱ्या ८५ अंशाच्या कोनातले कडे त्यांनी सर केले. लक्ष्याच्या जवळ येताना पाकिस्तानी सैनिकांना त्यांची चाहूल लागली आणि त्यांनी प्रचंड गोळ्यांचा वर्षाव त्यांच्यावर सुरु केला. मोर्टार आणि गोळ्यांच्या पावसात भारतीय सैनिक लपायला कोणतीही जागा नसताना आपल्या लक्ष्याकडे आगेकूच करत होते. या धुमश्चक्रीत हवालदार शिशराम गिल यांच्या पायाला गोळ्या लागल्या आणि ते जवळपास जायबंदी झाले. परत मागे फिरण्याची मुभा असताना देखील आपण मागे गेलो तर आपल्या सैनिकांच मनोधैर्य खचेल आणि आपलं लक्ष्य पूर्ण होणार नाही. तसेच देशाच्या सुरक्षिततेसाठी दिलेला आपला शब्द खाली पडेल जो आपण आपल्या कमांडिंग ऑफिसर ला दिला होता याची जाणीव असल्याने त्यांनी मागे फिरण्याचा निर्णय न घेता उलट अजून त्वेषाने शत्रूवर गोळीबार करत आपली आगेकूच सुरु ठेवली. जखमी अवस्थेत ही त्यांनी पाकिस्तान च्या १ कमांडिंग ऑफिसर, २ ज्युनिअर ऑफिसर, ३ इतर सैनिकांचा आपल्या गोळ्यांनी वेध घेतला. तब्बल ६ पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी ढगात पाठवून दिलं होतं. तर अजून ४ सैनिकांना त्यांनी जखमी केलं. त्यांच्या या पराक्रमापुढे पाकिस्तानी सैनिकांनी नांगी टाकली. भारताने सकाळी ३ वाजता मंजू पोस्टवर तिरंगा फडकावला. आपलं लक्ष्य पूर्ण केल्यानंतरच हवालदार शिशराम गिल हुतात्मा झाले.
हर करम अपना करेंगे
ए वतन तेरे लिए......
दिल दिया है जां भी देंगे
ए वतन तेरे लिए..
हवालदार शिशराम गिल यांनी अदम्य साहस, पराक्रम आणि देशप्रेम दाखवताना आपल्या देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यांच्या या अभूतपूर्व देशभक्ती बद्दल भारत सरकारने त्यांना 'वीर चक्राने' सन्मानित केलं. काल निवृत्त लेफ्टनंट जनरल पाटणकर यांच्याकडून त्यांच्याविषयी ऐकताना हा पराक्रम किती मोठा होता याची जाणीव झाली. त्यांच्या मते हवालदार शिशराम गिल हे तानाजी मालुसरे होते. कारण त्यांनी मंजू पोस्ट जिंकली पण सरांनी आपला सिंह गमावला. ९ जुलै १९९९ ला आपल्या वाढदिवसाच्या अवघ्या ७ दिवस आधी त्यांनी देशासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलं.
आज या गोष्टीला २२ वर्षाचा काळ लोटला पण भारतीय नागरिकात हवालदार शिशराम गिल यांच नाव कुठेच येत नाही. आमच्या पुढच्या पिढीला औरंगजेब आणि मुघल शासक किती चांगले होते हे पद्धतशीरपणे शिकवलं जाते. पण भारतमातेसाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे हवालदार शिशराम गिल सारखे कित्येक सैनिक इतिहासाच्या पानात जाणूनबुजून लुप्त केले जातात. आज कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने अश्या अनेक विरांच्या स्मृतीस मी कडक सॅल्यूट करतो. तसेच त्यांच्या पराक्रमाचा वारसा माझ्या शब्दातून पुढच्या पिढीकडे देण्याचं एक वचन देतो.
जय हिंद!!!